कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प!
स्वातंत्र्य आले, सरकारे बदलली पण तेथील जनतेचे दुष्काळाचे भोग काही सुटत
नाहीत. माणदेशी पट्टयातील लोकांचा मुख्य व्यवसाय शेती असूनही, वेळीअवेळी
पडेल तेवढ्या पावसाच्या भरवशावर तेथील लोक दिवस ढकलतात. विशेष म्हणजे
मान्सूनचा मुख्य पाऊस त्या भागात न पडता, तेथे, परतीचा मान्सून म्हणजे
ऑगस्ट-सप्टेंबर या काळात तो सक्रिय असतो. तेथे जास्तीत जास्त पन्नास-साठ
सेंटिमीटर, तर कमीत कमी पंधरा सेंटिमीटर एवढा पाऊस पडतो. कधी कधी तर सलग
पाच – पाच वर्षे पाऊसच पडत नाही! पाऊस घेऊन निघालेले काळेभोर ढग बर्याच
वेळा माणदेशावरून पुढे जातात व तेथे सांगली-कोल्हापूरात बरसतात. त्यांचा
माणदेशवर रुसवा का ते कळत नाही. हवामान शास्त्रज्ञांनाही ते कोडे वाटते.
माणदेशचे हवामान समशीतोष्ण असले तरी उष्ण आणि निम शुष्क किंवा कोरडे असे
आहे. सरासरी कमाल तापमान एप्रिल-मे मध्ये पंचेचाळीस अंश सेंटिग्रेड तर
डिसेंबर-जानेवारीत पंधरा-सतरा अंशापर्यंत खाली घसरलेले आढळते. खरीप पिकांची
शाश्वती तेथे देता येत नाही. पावसाच्या चार-दोन झडींवर थोड्याफार
रब्बीच्या पेरण्या झाल्या तरी निसर्ग पुढच्या पावसाची हमी कधीच देत नाही!


परंतु
भीमा नदी ही कृष्णा नदीच्या खो-यातील नदी असल्याने त्या नदीचा विचार
स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. कृष्णेच्या पाण्याचा विचार करता त्या नदीच्या
सर्व पाण्याचे वाटप यापूर्वीच झाले आहे. अतिरिक्त पाण्याच्या संदर्भात
आंध्र आणि कर्नाटक या राज्यांबरोबर महाराष्ट्राचे तंटे सुरू आहेत. अशा
स्थितीत कृष्णा खो-यातच अतिरिक्त पाणी आणून पुढे ते पाणी अनुक्रमे येरळा,
अग्रणी आणि माणगंगा या दुष्काळी तालुक्यांतील नद्यांना कमी खर्चात आणि कमी
वेळेत कसे देता येईल याचा अभ्यास सुरू झाला. पाटबंधारे अभियंता डी.डी.पवार,
माणगंगा सहकारी साखर कारखान्याचे (आटपाडी) अभियंता एच.एस. पाटील, निवृत्त
पाटबंधारे कर्मचारी पी.ए.पाटील आणि पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूट मध्ये
एरियल फोटोग्राफी करणारे अमोल पवार यांच्या पथकाने तो अभ्यास केला. त्या
पथकात मीही सहभागी होतो. सुरूवातीला, सावित्री या महाबळेश्वरातून उगम
पावणा-या नदीची उपनदी ढवळी नदीचे पाणी उताराने येऊ शकते असा आराखडा तयार
करण्यात आला. महाबळेश्वरच्या माथ्यावर पडणारे प्रचंड पाणी पावसाळ्यात
कोकणात मोठ्या प्रमाणावर वाहून जाऊन अरबी समुद्रात अक्षरशः वाया जाते. त्या
अभ्यासातून पुढे आला कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प.
कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प

माणगंगा ही भीमानदीची उपनदी असली तरी भीमा ही कृष्णेची उपनदी आहे.
त्यामुळे माणगंगेसह अग्रणी आणि येरळा या तिन्ही नद्या कृष्णा नदीच्या
खो-यात येतात. त्यामुळे कृष्णेचे पाणी या तिन्ही नद्यांना नैसर्गिक
न्यायाने मिळाले पाहिजे. म्हणून कृष्णा लवादाच्या वाटपाअतिरिक्त
पावसाळ्यातील ४.५२ टी.एम.सी. पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्या शिवाय
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा
बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे
आणण्यात येणार आहे.
असा हा प्रकल्प आराखडा

सोळशी
ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (तालुका
आटपाडी, जिल्हा सांगली) या दरम्यान एकशेसतरा किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य
बोगदा काढण्यात येणार आहे. त्या बोगद्याला धोमपासून शहात्तर किलोमीटरवर
दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला पंधरा किलोमीटर अंतरावर असणा-या पिंगळी
नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्यात येणार आहे. ही पिंगळी नदी
गोंदावले बुद्रुकजवळ माणगंगेला मिळते. ते अंतर साधारणत: साडेचार किलोमीटरचे
आहे. त्यामुळे गोंदावले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघू
पाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे यांना पाणी मिळेल.
दरम्यान, धोम धरणातून दुस-या मुख्य बोगद्याद्वारे पाणी दबई नाल्यात
येईल. जवळच्या जांभुळणी नाल्यातून पुढे चार किलोमीटरवर घाणंद संतुलन
तलावात आणण्यात येणार आहे. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात
असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्यांचा) वापर करण्यात येणार
आहे. दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावाकडे
जाईल. तो तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस
माणगंगा नदीला जाईल. तिकडे पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी
तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून
सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.
इकडे
घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी,
मानेवाडी, हिवतड या मार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी,
कानकात्रेवाडी, माळेवस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्या
करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरेवस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील
सर्व लहानमोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या
शाखेला कवठेमहांकाळकडे जाणा-या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे,
नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच, ज्या ज्या ठिकाणी पाणी
साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्या बाजूस
माणगंगा नदीला मिळणार आहे.
येरळा
ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. माणगंगा ज्या
महादेवाच्या डोंगररांगांतून उगम पावते, त्याच डोंगराच्या अलिकडच्या,
म्हस्कोबाच्या डोंगरातून येरळेचा उगम होतो. माणगंगा उगमस्थान आणि येरळा
उगमस्थान यांत फक्त चौदा किलोमीटरचे हवाई अंतर आहे. नदीच्या एकूण शंभर
किलोमीटर लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रम्हनाळ अशा अडुसष्ट
किलोमीटरच्या पात्राला थेट पाणी मिळणार आहे. धोम धरणातून आलेल्या एकशे
सतरा किलोमीटर लांबीच्या मुख्य बोगद्याला पंचाऐंशी किलोमीटरवर शंभर मीटर
लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी
तलावात सोडण्यात येणार आहे. ते पाणी पुढे येरळेला मिळणार आहे.
अग्रणी
या कृष्णेच्या आणखी एक उपनदीलाही प्रकल्पाव्दारे प्रवाहित करता येणार आहे.
अग्रणी नदी खो-याची लांबीपंचाहत्तर किलोमीटर इतकी आहे. नदी भूड (तालुका
खानापूर, जिल्हा सांगली ) येथील भिवघाटाच्या समांतर उत्तरेला असणा-या
डोंगरातून उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू
योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांव्दारे पुढे नेलकरंजी
(तालुका आटपाडी) फाट्यापासून पाच किलोमीटरचा बोगदा काढून अग्रणी नदीला
वायफळे गावाच्या अलिकडे यमगरवाडी रस्त्याजवळ (तालुका तासगाव) अग्रणीला
पाणी देता येईल. अग्रणीला पाणी चार मीटरच्या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून
बोगद्याद्वारे मिळेल. अग्रणी नदी तासगाव आणि कवठेमहांकाळपासून पुढे
कर्नाटकातील खिळेवाडी(जिल्हा बेळगाव)च्या पलीकडे जाऊन कृष्णा नदीला मिळते.
अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.

असा असेल बोगदा

माणगंगा पाणलोटातील लाभक्षेत्र :
मध्यम प्रकल्प : राजेवाडी (म्हसवड तलाव, तालुका माण), संख तलाव (तालुका जत), बुध्दी हाळ तलाव (तालुका सांगोला ).
लहान प्रकल्प : आटपाडी तालुका -जांभुळणी, घाणंद, अर्जुनवाडी, माळेवाडी, निंबवडे, दिघंची व आटपाडी - जत तालुका- भिवर्गी
कोल्हापूर पध्दतीचे बंधारे- आटपाडी तालुका : लिंगिवरे, दिघंची (२), लोणारवाडी, कौठुळी, बनपुरी, शेटफळे, देशमुखवाडी, पांढरेवाडी.
सांगोला
तालुका- लोटेवाडी, खवासपूर, कमळापूर, वासुद- अकोले, वाढेगाव, बलवडी, नाझरे,
आलेगाव, कडलास (२), चिनके, वाटंबरे , सावे, मेथवडे, जवळे (२), सोनंद (२),
मांजरी (३).
जत तालुका : अंकलगी, बेळुंडगी, जालीहाळ बुद्रुक, मोरबगी, माणिकनाळ, सोन्याळ (२), निगडी कारंडेवाडी, बालगाव.
मंगळवेढा
तालुका- गुंजेगाव. त्या शिवाय उभारण्यात येणा-या काही प्रकल्पांनाही पाणी
मिळणार आहे. त्यामध्ये लघु पाटबंधारे तलाव -अंकलगी व शेगाव (तालुका जत),
कोल्हापूर
पध्दतीचे बंधारे- सिंगन हळ्ळी(तालुका जत), बामणी, उदनवाडी ,जवळे (तालुका
सांगोला), बोंबेवाडी (तालुका आटपाडी) यांसह जत तालुक्यातील उमदीचे आणखी दोन
आणि मोरबगीचा एक अशा तीन लहान प्रकल्पांनाही पाणी मिळणार आहे.
अग्रणी नदीच्या काठावरील लाभक्षेत्रातील गावे –
तासगाव तालुका : वायफळे, सिद्धवाडी, बिरणवाडी सावळज, अंजनी, वज्रचौंडे.
कवठेमहांकाळ
तालुका : बोरगाव, शिरढोण, मोरगाव, देशींग, शिंदेवाडी, कवठेमहांकाळ, हिंगण
गाव, विठुरायाची वाडी, करोली-टी, अग्रण-धुळगाव , रांजणी, लोणारवाडी आणि
कोंगनोळी.
येरळा नदीकाठच्या एकूण चौसष्ट गावांना थेट पाणी मिळणार आहे. ही गावे अशी –
खटाव तालुका
: येरळवाडी, कुमठे, उंबरडे, गुरसाळे, काळेवाडी, गोरेगांव, बनपूरी,
धोंडेवाडी, आंबवडे, शेनवडी, चितळी, मायणी, म्हासुर्णे, ल्हासूर्णे,
चोराडे, गुंडेवाडी, शिरसवडी, होळीचा गांव, पळसगाव ,पिंपरी, शितोळेवाडी आणि
सुर्याचीवाडी.
खानापूर तालुका : चिखलहोळ, हिंगणगादे, कळंबी, ढवळेश्वर, पंच लिंगनगर,भाळवणी,कमळापूर आणि तांदुळवाडी.
कडेगाव
तालुका : कान्हरवाडी, येतगाव, तुपेवाडी, भिकवडी,हणमंत वडिये, नेवरी,
आंबेगाव, येवलेवाडी, वडियेरायबाग, शिवणी, शेळकबाव, शिरगाव आणि रामापूर.
तासगाव तालुका : निंबळक, बोरगाव, विसापूर, ढवळी, निंमगाव, तासगाव, नागाव, बेंद्री आणि शिरगाव -कवठे.
पलुस तालुका : वाझर,आंधळी, मोराळे,राजापूर,बांबवडे, बुर्ली, नेहरु नगर, जुळेवाडी, हजारवाडी, माळवाडी, वसवडे, खटाव आणि ब्रम्हनाळ.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये
* पिंगळी, येरळा आणि अग्रणी अशा चार नद्या जोडण्यात येणार.
* भारतातील नंबर दोनच्या व महाराष्ट्रातील क्रमांक एकच्या अति-अति तुटीच्या भागाला हक्काचे पाणी मिळणार
* पाणी नैसर्गिक उताराने येणार असल्यामुळे विजेचा प्रश्न नाही.
* कोठेही पाणी उचलायचे (लिफ्ट करायचे) नसल्याने वाढीव विजेचा प्रश्न उद्भवणार नाही.
* बोगद्याच्या एकूण शंभर फूट उताराचा उपयोग किमान सात ते आठ मेगावॅट वीज निर्मिती करण्यासाठी शक्य.
* सांगली,
सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दहा दुष्काळी तालुक्यांतील
शेकडो गावांचा आणि खेड्यापाड्यांचा पाणीप्रश्न कायमचा सुटून टँकर्स, चारा
छावण्यांसाठी होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च वाचणार आहे. दुसरीकडे वाई
शहरासह कृष्णाकाठच्या गावांना महापूराचा धोका राहणार नाही.
* योजनेसाठी
फक्त बोगद्यांसाठी किंवा आवश्यक तिथे कालव्यांसाठी लागणारी जमीन शासनाला
संपादित करावी लागणार. ती बहुतांशी जमीन शासकीय आहे. त्यामुळे गाव उठवावे
लागणार नाही आणि पुर्नवसनाचा प्रश्नही निर्माण होणार नाही.
*एकशे साठ
किलोमीटर लांबीच्या माणगंगा, येरळा आणि अग्रणी या नदी पात्रांच्या अंतराचा
नैसर्गिक कालवा म्हणून उपयोग होऊन या तिन्ही नद्यांच्या काठावरील एकूण
साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल.
* या भागातील झाडे-झुडपे वाढून वातावरणातील आर्द्रता वाढून भविष्यातील तापमानवाढीचा धोका टळेल.
* दरवर्षी पाणी वाहिल्यामुळे तिन्ही नदीकाठच्या विहिरी जिवंत होतील; तसेच, नैसर्गिकरीत्या भूगर्भपातळी वाढेल.
*माणगंगेवरील
सध्याचे बत्तीस व येरळेवरील दहा बंधारे आणि भविष्यात उभारण्यात येणा-या
बंधार्यांमुळे नद्यांत कायमस्वरूपी पाणी राहील.
*माणगंगा
नदी सरकोली जवळ (तालुका पंढरपूर) भीमेला मिळते. तेथून पुढे औज आणि टाकळी
बंधार्यांत पाणीसाठा वाढल्याने सोलापूर शहराचाही पाणीप्रश्न सुटण्यास मदत
होईल.
कृष्णा-माणगंगा नदीजोड बहुउद्देशीय प्रकल्प
नैसर्गिक रचना.....(समुद्र सपाटी पासूनची उंची)
* सोळशी नदी = ७५० मीटर (कोयना पाणलोट, धनगरवाडी गावाजवळ)
* धोम धरण = ७४६.९५ मीटर ( कृष्णा नदी, ता.वाई,जि.सातारा)
* जांभूळणी = ७१६ मीटर (ता. आटपाडी जि.सांगली)
* गोंदावले(बुद्रूक)= ७१६ मीटर (पिंगळी नदी, ता. माण, जि.सातारा)
* दरूज (ता.वडूज) = ७१२ मीटर (लेंडूर ओढा-येरळा नदी,जि.सातारा)
* नेलकरंजी (ता.आटपाडी) = ७११ मीटर
(आटपाडी-भिवघाट रस्त्याजवळील टेंभूचा कालवा)
* अग्रणी नदी = ७०८ मीटर (यमगरवाडी, सिध्देवाडी तलावाजवळ)
दुष्काळी भागासाठी कृष्णेचे अतिरिक्त उपलब्ध पाणी वळवून माणगंगा, येरळा
आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना कमी खर्चात व कमी वेळेत आणता येईल, यासाठी
बारमाही माणगंगा नावाने सातत्याने लिखाण करत गेल्या चार वर्षांपासून
पाठपुरावा केला. कृष्णा-माणगंगा नदीजोड प्रकल्प राज्य शासनाच्या
महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ - पुणे यांच्या सातारा पाटबंधारे
प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी(कराड) यांनी तयार करून जलसंपदा
विभागाकडे पाठवला आहे. त्यास शासनाच्या अनेक उच्चस्तरीय अधिका-यांकडून
सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. गरज आहे, सामुहिक प्रयत्नांची. आपसातील
राजकीय आणि प्रादेशिक मतभेद बाजूला ठेवून या बहुउद्देशीय प्रकल्पाला
पाठिंबा मिळण्याची.
विजय लाळे
विजय आनंद अपार्टमेंट,
नेवरी रोड, संभाजीनगर,
विटा शहर, जिल्हा सांगली ४१६३११
मोबाइल ८८०५००८९५७
विजय आनंद अपार्टमेंट,
नेवरी रोड, संभाजीनगर,
विटा शहर, जिल्हा सांगली ४१६३११
मोबाइल ८८०५००८९५७